आधुनिक इतिहास लेखन म्हणजे काय?
व्युत्पत्तीद्वारे दिसून येणाऱ्या अर्थाचा विचार केला तर इतिहास म्हणजे केवळ भूतकाळात काय घडले ह्याची नोंद इतकाच अर्थ निघतो. परंतु ह्या शब्दाला इतर अर्थही कालौघात लगडलेले आढळतात. आधुनिक काळात केवळ पूर्ववृत्ताचे निवेदन इतकाच अर्थ ह्या संज्ञेला राहिला नसून ते निवेदन साधार, वास्तव असणेही त्यात गृहीत धरलेले असते.

आधुनिक इतिहासलेखनाच्या पद्धतीची चार प्रमुख वैशिष्ट्ये सांगितली जातात :

(१) ही पद्धती शास्त्रशुद्ध आहे. तिची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते.

(२) हे प्रश्न मानवकेंद्रित असतात. म्हणजेच ते भूतकाळातील विविध मानवी समाजाच्या सदस्यांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृतींसंबंधी असतात. इतिहासात त्या कृतींचा संबंध दैवी घटना किंवा देवदेवतांच्या कथाकहाण्यांशी जोडण्याचा प्रयत्न केला जात नाही.

(३) या प्रश्नांच्या इतिहासातील उत्तरांना विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असतो. त्यामुळे इतिहासाची मांडणी तर्कसुसंगत असते.

(४) मानवजातीने भूतकाळात केलेल्या कृतींच्या आधारे मानवजातीच्या वाटचालीचा वेध इतिहासात घेतला जातो.