मराठी लघु कथा या पुस्तकाचे लेखक कोण?

विठ्ठल सीताराम गुर्जर उर्फ वि.सी. गुर्जर (जन्म : कशेळी, १८ मे, इ.स. १८८५ - कशेळी, १९ सप्टेंबर, इ.स. १९६२) हे मराठी लघुकथा लेखक होते. यांनी लघुकथा लेखनात एक स्वतंत्र कालखंड सुरू केल्याचे समजले जाते.

लघुकथांचे वैशिष्ट्य :

इ.स. १९१०पर्यंत नियतकालिकांमध्ये होणाऱ्या कथांवरती बहुधा लेखकाचे नाव नसे, असलेच तर त्याचे टोपण नाव असे. १९१० च्या दिवाळी अंकापासून कथेचे वेगळे अस्तित्व जाणवू लागले व कथांवर लेखकाचे नावही मानाने झळकू लागले. या काळात कथेला लोकप्रिय करण्याचे श्रेय प्रामुख्याने वि.सी. गुर्जर यांच्याकडे जाते. गुर्जरांची कथा ही संपूर्ण गोष्ट म्हणून ओळखली जाते. याचे कारण ह्या कथा मुख्यतः दीर्घकथाच होत्या. गुर्जरांनी कथालेखनाला १९१० च्या आसपास सुरुवात केली. १९६२ पर्यंत, म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांचे कथालेखन अव्याहत चालू होते. त्यांनी सुमारे ८००हून अधिक कथा लिहिल्या. त्यांच्या कथालेखनाचा काळ जरी १९६२ पर्यंत असला, तरी १९२० पर्यंतचे त्यांचे क्षेत्रातील कार्य महत्त्वाचे आहे. मनोरंजन मासिकातून प्रकाशित होणारी गुर्जरांची कथा हे त्या वेळी वाचकांचे प्रमुख आकर्षण होते. गुर्जरांनी वयाच्या ५१व्या वर्षापर्यंत एकूण ३०,००० छापील पृष्ठे भरतील इतके लिखाण केले.

गुर्जरांनी मराठी कथेची दृष्टी बदलली. मराठी कथा तोपर्यंत बोधप्रधान होती, ती त्यांनी रंजनप्रधान केली, हे त्यांचे महत्त्वाचे कार्य. त्यामुळे त्यांच्या कथांतून आपोआप रहस्याला व घटनांना प्राधान्य मिळू लागले. कथानकांमध्ये वाचकांची उत्कंठा वाढविण्यासाठी कोणतेना कोणते तरी रहस्य निर्माण करायचे. त्यातील गुंतागुंत वाढवून वाचकांचे कुतूहल शेवटपर्यंत जागृत ठेवावयाचे व शेवटी कथानकाला अनपेक्षित कलाटणी देऊन वाचकांना विस्मयाचा धक्का द्यावयाचा, या तंत्राचा गुर्जरांनी आपल्या गोष्टींतून अवलंब केला होता. त्याच्या जोडीला त्यांनी कथांतून चुरचु्रीत संवाद आणले; नर्म विनोद आणला; खेळकर भाषाशेलीही आणली. त्यामुळे त्यांच्या कथांना तत्कालीन वाचकवर्गांच्या मनाची चांगलीच पकड घेतली.