राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना २७ जुलै १९४८ला करण्यात आली.

२. राज्य राखीव पोलीस दलाची रचना

अ. राज्य राखीव पोलीस दलाच्या सर्वांत प्रमुख मुख्याधिकार्‍याला कमांडंट म्हणतात. हे जिल्ह्याच्या एस्.पी.प्रमाणे पद असते. त्या खालोखाल साहाय्यक अधिकार्‍याचे पद जिल्ह्याच्या डी.वाय.एस्.पी.प्रमाणे असते.

आ. कामाला अनुसरून यांच्या वेगवेगळ्या तुकड्या (कंपनी) असतात, उदा. अ तुकडी, ब तुकडी, क तुकडी इत्यादी. या तुकड्या सोडून गटामध्येच स्थानिक आणि प्रशासन नावाची तुकडी असते. स्थानिक तुकडी सुरक्षा सेवेसाठी (बंदोबस्तासाठी) बाहेर जात नाही. ती गटातीलच सुरक्षा आणि प्रशासन यांचे काम करते. बाकी अ, ब, क या तुकड्या कार्यरत असतात. त्या सतत आपापल्या पाळीनुसार सुरक्षा सेवेसाठी फिरतीवर असतात.

इ. प्रत्येक तुकडीवर नियंत्रण करण्यासाठी एक आय पोलीस निरीक्षक असतो. एका तुकडीमध्ये १ पी.आय. आणि ३ पी.एस्.आय. असतात. त्याच समवेत १२ ते १६ हवालदार, बाकी राहिलेले नाईक अन् पोलीस शिपाई असतात. अशी एकूण १२० लोकांची एक तुकडी असते.

ई. ज्या वेळी प्रत्यक्ष सुरक्षा सेवा असते, त्या वेळी या तुकड्या गट शिबिरांंमध्ये नसतात आणि ज्या तुकड्या गटांमध्ये असतात, त्यांना गट सुरक्षेची सेवा (ड्युटी) असते. ही सुरक्षा सेवा गटांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असते. सुरक्षासेवकांची प्रत्येक २४ घंट्यांनी अदलाबदल केली जाते.

उ. गटांमध्ये एक तुकडी सतत राखीव असते. समजा, एखादी तुकडी तात्काळ पाचारण करायची असेल, तर या राखीव तुकडीला तेथे हलवता येते.

ऊ. इतर वेळी गटांमध्ये सकाळ-दुपार-संध्याकाळ अशी ३ वेळा उपस्थिती (हजेरी) घेतली जाते. कुणी कुठे बाहेर जाऊ नये आणि गेले, तरी २-३ घंट्यांतच परत यावे, यासाठी अशी उपस्थिती घेतली जाते.

ए. जिल्हा ग्रामीण पोलीस यांना गुन्हे आणि खटले यांची कामे असतात, तसे लिखाणाचे कसलेच काम राज्य राखीव पोलीस दल याच्याकडे नसते.

ऐ. प्रत्येक तुकडीच्या समवेत २ भोजनसेवक, एक मोची, एक धोबी, एक सफाई कामगार, असे चतुर्थ श्रेणी कर्मचारीसुद्धा असतात. प्रत्येक तुकडीच्या समवेत त्यांच्या जेवणासाठी भांडी, शेगड्या, गॅस आणि वेगवेगळे तंबू असतात. यामुळे प्रत्येक ठिकाणी जेवणाची सोय असते. राज्य राखीव पोलीस दल यांचे स्वतंत्र शिबिर (कॅम्प) असते. त्यांना रहाण्यासाठी घरे (क्वार्टर्स) दिली जातात.

ओ. आताच्या नियमानुसार १५ वर्षांनंतर राज्य राखीव पोलीस दलामधून जिल्हा किंवा ग्रामीण पोलीस येथे बदलून जाता येते.
३. राज्य राखीव पोलीस दलाचे काम

अ. संपूर्ण राज्यामध्ये कुठेही नैसर्गिक आपत्ती आल्यास किंवा दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाल्यास राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी बोलावली जाते, तसेच जेव्हा सरकारी मालमत्तेस हानी पोचवली जाते आणि जिल्हा अन् ग्रामीण पोलीस यांच्या आवाक्याबाहेर परिस्थिती जाते, त्या वेळीही निमलष्करी दल म्हणून राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी पाचारण करून परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जातो.

आ. याच समवेत वेगवेगळ्या सणांसाठी सुरक्षा व्यवस्था असतात. मुंबईमध्ये साधारण वर्षामध्ये ४५ दिवसांसाठी सुरक्षेसाठी निश्‍चित ठिकाणे (फिक्सड पॉईंट्स) असतात. सुरक्षासेवेसाठी गडचिरोली आणि गोंदिया या नक्षलग्रस्त भागांतही ५ मासांंसाठी सुरक्षेसाठी निश्‍चित ठिकाणे असतात. नक्षलग्रस्त भागात २ वर्षांत ५ मासांसाठी राज्य राखीव पोलीस दलाच्या सुरक्षासेवकांना जावे लागते.