लोकसंख्या : प्राचीन काळापासून लोकसंख्या व तिची वैशिष्ट्ये ह्यांविषयीचे औत्सुक्य लोकांच्या मनात असल्याचे काही दाखले आपल्याला इतिहासात सापडतात. ख्रिस्तपूर्व ३२१ ते २६९ ह्या काळात लिहिलेल्या कौटिलीय अर्थशास्त्र नामक भारतीय ग्रंथात तसेच आईन-इ-अकबरी ह्या ग्रंथातही, लोकसंख्याविषयक विवेचन केलेले आहे. परंतु लोकसंख्येच्या शास्त्रशुद्ध अभ्यासाचा पाया घालण्याचे श्रेय मात्र जॉन ग्रॅंट (१६२०−७४) ह्या ब्रिटिश संशोधकाकडे जाते.

लोकसंख्येच्या अभ्यासात आकडेवारीला असाधारण महत्त्व असते. आकडेवारीचा, मुख्यतः जनगणना व नोंदणीपद्धत यांचा, सार्वत्रिक वापर तसा अलीकडचाच, म्हणजे एकोणिसाव्या शतकातीलच आहे. याआधीच्या लोकसंख्येची आकडेवारी ही अंदाजाच्या स्वरूपात होती. ऐतिहासिक काळातील लोकसंख्येचे अंदाज आणि आधुनिक काळातील जनगणनांचे आकडे ह्यांवरून जागतिक लोकसंख्येचे विभाजन, वाढ इत्यादींबाबतचे विश्लेषण पुढे स्पष्ट केले आहे.

जागतिक लोकसंख्यावाढ आणि विभागणी : ह्या भूतलावर मानव हा कमीतकमी पाच लाख वर्षांपासून राहात असावा, असा मानवशास्त्रज्ञांचा अंदाज आहे. साधारणपणे दहा हजार वर्षांपूर्वी जगाच्या पाठीवर सु. ५० ते १०० लाख लोक राहत असावेत. ख्रिस्तयुगाच्या प्रारंभी म्हणजे सु. ८ हजार वर्षांनंतर ही लोकसंख्या तीस कोटींच्या घरात गेली असावी. यानंतर इ. स. १००० पर्यंत ह्या आकड्यात काहीच फरक पडला नसावा, असे अनुमान आहे. विलफॉक्स व कार−साँडर्स ह्या संशोधकांच्या मते १६५० मध्ये जगाची एकूण लोकसंख्या ४७ ते ५५ कोटी असावी. १७७० मध्ये ती ६८ ते ७३ कोटीपर्यंत वाढली असावी. तक्ता क्रमांक १ मध्ये १६५० ते १९८० पर्यंत जागतिक लोकसंख्या आणि तिचे विभाजन यांसंबंधीची आकडेवारी दिली आहे.

जागतिक लोकसंख्येचे वृद्धिकल : १७५० नंतर लोकसंख्येची वाढ झपाट्याने होऊ लागली. वाहतुकीच्या साधनांतील सुधारणांमुळे दुष्काळी भागांना मदत पोहचविणे शक्य होऊ लागले. त्यामुळे मृत्यूची भीषण आपत्ती कमी झाली राहणीमानही सुधारले. परिणामतः लोकसंख्यावाढीचा दर वाढत गेला. एकोणिसाव्या शतकात अधूनमधून दुष्काळाने आपले डोके वर काढले आणि लोकसंख्यावाढ मंद गतीने झाली. त्यानंतर मात्र सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता ह्यांबद्दलची वाढती जाण व औद्योगिक क्रांतीमुळे झालेला