बरेचदा भाषांतर आणि अनुवाद ह्यांना एकसारखेच स्थान दिले जाते. मात्र तसे नाही. भाषांतर आणि अनुवाद ह्यांच्यातला फरक खरेतर तसा सूक्ष्म आहे, पण फार मोठ्या अर्थाचा अनर्थसुद्धा करू शकतो. भाषांतर करताना मूळ शब्द अथवा वाक्यरचना जशीच्या तशी ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. जसे एका भाषेतील शब्दाला दुसऱ्या भाषेतील शब्द योजने. एकेका शब्दापुरते भाषांतर मर्यादित असल्यास विशेष बाब नाही. मात्र शब्दसमूह अर्थात वाक्यरचनांचे भाषांतर करत असताना, शब्दाला शब्द हा दृष्टिकोन ठेवल्यास मूळ वाक्यांच्या आणि लिखाणाच्या भावार्थाचा ऱ्हास घडून येतो. अनुवादात मूळ लेखनाचे शब्दशः रूपांतर न करता त्यातला मथितार्थ समजून घेणे व सौंदर्यस्थळे जाणून घेऊन ती योग्य रितीने अनुवादात उतरवणे, आवश्यक असते.

खरेतर हे अतिशय साधे उदाहरण आहे, मात्र मोठमोठ्या वाक्यांचे, साहित्य कृतींचे अनुवाद करताना ही बाब दुर्लक्षित केल्यास मोठ्या चुका घडून अनुवादाचा / लिखाणाचा विचका होऊ शकतो. अशा चुका टाळण्यासाठी अनुवादकांना विशेष दक्षता घ्यावी लागते. मूळ लेखक, त्यांचे दृष्टिकोन, लेखनामागचा उद्देश, स्रोत भाषा, भाषेची मांडणी, भाषेचे सौंदर्य अशा नानाविध गोष्टी लक्षात घेऊन, त्या वाक्यांचा वरवर लक्षात येणारा अर्थ, त्यांचा लक्ष्यार्थ अर्थात अर्थाचा मूळ गाभा , आत्मा जाणून घेऊन जो अनुवाद करू शकतो, तो खरा आणि उत्तम अनुवादक होतो. नवागत अनुवादकांनी हे धोरण लक्षात ठेवूनच अनुवाद केला पाहिजे.

सोप्या भाषेत अनुवाद हे भाषांतराचे पुढचे पाऊल म्हणावे लागेल.


अनुवादप्रक्रिया

अनुवाद प्रक्रियेत ज्या भाषेतला मजकूर दुसऱ्या भाषेत आणायचा असतो, त्या भाषेला मूळ भाषा किंवा उगम भाषा अथवा स्रोत भाषा म्हणतात आणि ज्या भाषेत तो मजकूर आणला जातो त्या भाषेला लक्ष्य भाषा म्हणतात.[१]

चांगल्या अनुवादासाठी अनुवादकाला दोन्ही भाषांची उत्तम जाण असावी लागते. त्याचा दोन्ही भाषांचा सखोल अभ्यास असावा लागतो. त्याचे शब्दज्ञान आणि शब्दसंग्रह परिपूर्ण असावा लागतो. अर्थात हे काम करताना आणि अभ्यासाने हे ज्ञान वाढत जाते.[१]

अनुवादकाला दोन्ही भाषांतील व्याकरणाचेही ज्ञान असावे लागते.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनुवादकाला स्रोत भाषा आणि लक्ष्य भाषा बोलणाऱ्या समूहाची किंवा समाजाची भाषिक , सांस्कृतिक जाण, बोलीभाषा-पद्धती ह्यांचीही आवश्यक ती माहिती, समज असायला पाहिजे. [३]

मुळात अनुवादक हा अतिशय सृजनक्षम आणि संवेदनशील असावा लागतो. कारण प्रत्येक भाषा वेगळी असते. प्रत्येक भाषेची धाटणी - मांडणी वेगवेगळी असते. तिच्यातील शब्दांच्या समूहरचनेची अर्थात वाक्यरचनेची पद्धतसुद्धा वेगळी असते. त्या शब्दसमूहांच्या मांडणी-बदलातून घडून येणारे अर्थही त्यामुळे बरेचदा भिन्न होत जातात. जसे काही काही वाक्ये द्व्यर्थी असतात वा सरळ सरळ अर्थ न सांगणारी असतात - उदा. म्हणी, वाक्प्रचार, प्रांतीय / पारंपारिक संदर्भांनी सजलेली वाक्ये . काही म्हणी वा वाक्प्रचार तर असे असतात, जे केवळ त्या त्या प्रांतीय भाषेतच उपलब्ध असतात. त्यांचे संदर्भही तसेच मर्यादित असतात. अशा वाक्यरचना वा असे लिखाण असल्यास विशेष काळजी घ्यावी लागते. अशा वाक्यांचा अनुवाद हा त्यातला मूळ उद्देश, सौंदर्य बिघडू न देता अतिशय खुबीने करावा लागतो. त्यातला तो विशेष अर्थ अनुवाद वाचणाऱ्या वाचकाला नीट समजून यावा म्हणून विशेष मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे अनुवादकांचे काम सोपे अजिबात नाही. मात्र जो हे काम करू लागतो, त्याचे भाषाविश्व आणि शब्दविश्व अधिकाधिक समृद्ध होत जाते.[४]

अनुवादाऐवजी भाषांतर घडले असल्यास ती वाक्ये, माहिती, जाहिरातीतील गाण्यांच्या ओळी, सिनेमातले संवाद निश्चितपणे खटकतात. ही बाब हेच दाखवते की, अनुवादकाच्या कामात काही गडबड आहे.

थोडक्यात म्हणजे अनुवाद असा हवा की, जरी एकप्रकारे अनुवाद हा ' मूळ प्रतीची कॉपी' अर्थात 'मूळ लेखनाची प्रतिप्रत' असला तरीही निर्माण होणारी अनुवादित कलाकृती ही नवनिर्मिती वाटली पाहिजे, मूळ भाषेतील मसुद्याप्रमाणेच ही कलाकृती सुंदर, नाविन्यपूर्ण, आनंददायी आणि शैलीदार असायला हवी. म्हणूनच म्हटले आहे की, तो अनुवादक सृजनक्षम असावा लागतो. तरच निर्माण होणाऱ्या साहित्य-कृतीतून अनुवादक आणि वाचक दोघांनाही आनंद मिळू शकतो.