1.5 टक्के आहे, तर विकसित देशांचा फक्त 0.5 टक्के आहे. विकसनशील देशांच्या लोकसंख्येच्या जडणघडणीत भारताचा मोठा वाटा आहे...

जगाच्या लोकसंख्येने आतापर्यंत सातशे कोटींचा टप्पा ओलांडला आहे आणि ती सन 2050 पर्यंत जवळजवळ 900 कोटींपर्यंत जाऊन ठेपणार आहे. जगाच्या लोकसंख्यावाढीचा आधीचा वेग अतिशय कमी होता, म्हणजे सन 1804 मध्ये जगाची लोकसंख्या शंभर कोटी होती, ती 200 कोटी होण्यास 123 वर्षांचा कालावधी जावा लागला. त्यानंतर 200 कोटी लोकसंख्येचे 300 कोटी होण्यास फक्त 33 वर्षे लागली आणि त्यानंतर 300 कोटींची 400 कोटी लोकसंख्या फक्त 14 वर्षांत झाली. सध्याच्या वेगानुसार, सन 2028 मध्ये ती 800 कोटी झालेली असेल. मधल्या काळात अधिक असणारा वेग आता मंदावतो आहे, तरीही हळूहळू वाढत जाऊन सर्वसाधारणपणे सन 2200 पर्यंत जागतिक लोकसंख्या एक हजार कोटींवर जाऊन स्थिरावेल, असा अंदाज आहे.

सध्याच्या जागतिक लोकसंख्येत विकसनशील देशांची लोकसंख्या साधारणतः 80 टक्के आहे आणि ती सन 2050 पर्यंत 88 टक्के होण्याची शक्यता आहे. विकसनशील देशांचा लोकसंख्यावाढीचा वेग 1.5 टक्के आहे, तर विकसित देशांचा फक्त 0.5 टक्के आहे. विकसनशील देशांच्या लोकसंख्येच्या जडणघडणीत भारताचा मोठा वाटा आहे.
भारताची लोकसंख्या

लोकसंख्येच्या दृष्टीने भारत जगात सध्या दुसर्‍या क्रमांकावर आहे. पहिला क्रमांक अर्थातच चीनचा आहे. सध्याच्या भारतीय लोकसंख्यावाढीचे प्रमाण लक्षात घेता सन 2025 पर्यंत भारत चीनला मागे टाकून प्रथम क्रमांकावर येऊ शकेल. सध्याच्या जागतिक लोकसंख्येत भारताचा वाटा 17 टक्के आहे; परंतु जगाच्या भूभागांपैकी फक्त 2.4 टक्के भूभाग भारताने व्यापला आहे. दरवर्षी भारतीय लोकसंख्येत सुमारे 1.8 कोटींची भर पडते. या वेगाने सन 2050 पर्यंत भारतीय लोकसंख्या 153 कोटींवर पोहोचेल आणि तेव्हा चीनची लोकसंख्या 139 कोटी असेल.