१५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला देश स्वतंत्र झाला.
१९४७ पूर्वी इंग्रजांनी भारताला गुलाम केले होते. त्यांनी भारतीयांवर अनन्वित अत्याचार केले. त्यांविरुद्ध मोठमोठ्या देशभक्तांनी बंड केले. त्यांनी चळवळी केल्या; सत्याग्रह केले. त्यामुळे कित्येकांना फासावर लटकावले गेले. या सगळ्यांच्या त्यागामुळे आपला देश स्वतंत्र झाला.आपला भारत देश ब्रिटिशांच्या गुलामगिरीत दीडशे वर्षे खितपत पडला a होता. त्या गुलामगिरीतून आपली सुटका १५ ऑगस्ट, १९४७ रोजी झाली. ब्रिटिश इथून निघून गेले. युनियन जॅक खाली उतरला आणि त्या जागी तिरंगा ध्वज मोठ्या दिमाखाने वा-यावर लहरू लागला. देशाची जबाबदारी पंतप्रधान ह्या नात्याने पंडित नेहरू ह्यांच्या हाती सोपवण्यात आली तर राष्ट्रपतीपद डॉ. राजेंद्र प्रसाद ह्यांना दिले गेले.

दिल्लीतील लाल किल्ल्यावरून पंडित नेहरूंनी त्या दिवशी जे ऐतिहासिक भाषण केले ते कित्येक लोकांनी रेडियोवरून ऐकले. त्या काळात ब-याच लोकांपाशी रेडियोही नव्हता. त्यांना दुस-या दिवशी आलेल्या वर्तमानपत्रातून सगळी बातमी समजली. त्यानंतर आजतागायत दर वर्षी हा दिवस राष्ट्रीय पातळीवर उत्साहाने साजरा केला जातो.

मुख्य समारंभ लाल किल्ल्यावर होतो. त्या दिवशी पंतप्रधानांना तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख सलामी देतात. त्यांनी तिरंगा फडकवला की ध्वजाच्या सन्मानार्थ २१ तोफांची सलामी दिली जाते. मग राष्ट्राला उद्देशून पंतप्रधानांचे भाषण होते. ह्या प्रसंगी देशातील सन्माननीय व्यक्तींसोबत परदेशी पाहुणेही हजर असतात. भाषण संपल्यावर राष्ट्रगीत होऊन नंतर समारंभ संपतो.

ह्या दिवशी संपूर्ण देशभर सुट्टी असते. रात्रीच्या वेळेस सरकारी इमारतीवर विजेची रोषणाई केली जाते ती खास बघण्यासारखी असते.सर्व राज्यात आणि गावांत ध्वजारोहण सोहळा होतो.

आमच्या शाळेला ह्या दिवशी सुट्टी असली तरी आम्ही सर्वजण ध्वजवंदन करण्यासाठी शाळेत हजर राहातो. आमचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक आणि शिक्षिका त्या दिवशी पांढ-या कपड्यांमध्ये येतात. ध्वजवंदन झाले की आम्ही देशभक्तीपर गाणी कोरसमध्ये म्हणतो आणि नंतर घरी जातो.

स्वातंत्र्यदिनाचे महत्व खूप आहे कारण ह्या दिवशी आपण स्वतंत्र झालो. भूतकाळात झालेल्या चुका ह्यापुढे आपण करता कामा नयेत. स्वतंत्र भारताला प्रगतीपथावर नेले पाहिजे, येथील सर्व नागरिक सुखासमाधानाने नांदले पाहिजेत. एकजूटीने संकटांना सामोरे गेले पाहिजे ह्याची आठवण स्वातंत्र्यदिनच आपल्याला करून देतो.