ग्रामीण उद्योजकता म्हणजे काय?

ग्रामीण भागात ग्रामीण लोकांच्याच गरजा ओळखून केले जाणारे उद्योग. या उद्योगांतून स्थानिक लोकांना रोजगार मिळेल, विकासाच्या वाटेवर त्यांना चालता येईल, या उद्योगातून त्यांचं रोजचं जगणं सोपं होईल. मात्र हे उद्योग पूर्णत: 'प्रोफेशनल' असतील, समाजाभिमुख तरीही प्रोफेशनल. व्यावसायिक पण नफेखोर नाही.

👍 या उद्योगाची गरज काय?

1) भारतात गेल्या पाच दशकांत जे उद्योग वाढले ते शहरात वाढले. त्यामुळे ग्रामीण भागातील माणसं रोजगारासाठी मोठय़ा प्रमाणात शहरांकडे धावली. शहरातले लोंढे वाढले आणि ग्रामीण भागात विकासाच्या प्रश्नासह गरिबी कायम राहिली.
2) त्यात शेती हाच आजही देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा, आजही देशात 7क् टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. पण शेतीचे तुकडे झाले आणि हवामान लहरी. शेतीत भागत नाही ही तक्रार आहेच.
3) त्यामुळे शेतीला जोड म्हणूनही शेतीआधारित उत्पादनांमधून येणारा पैसा थेट ग्रामीण भागात पोहचवण्यासाठीही या ग्रामीण उद्योजकतेची गरज आहे.

👍 फायदे कुठले? कुणाला?

1) हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की, ग्रामीण भागात उद्योजकतेला प्रोत्साहन देत उद्योग सुरू झाले तर त्याचा फायदा नक्की कुणाला?
- ग्रामीण जनतेला! स्थानिक लोकांना!
2) मुळात या उद्योजकतेचा हेतूच हा आहे की, ग्रामीण भागात जास्तीत जास्त रोजगार निर्मिती झाली पाहिजे. ग्रामीण माणसांच्या हाती पैसा आला पाहिजे.
3) शहरी-ग्रामीण ही उत्पन्नाची दरी कमी करण्यासाठीही या उद्योगांचा फायदा होईल.
4) मुख्य म्हणजे ग्रामीण भागातील धडपडय़ा उद्योगी तरुणांना याचा जास्त फायदा होईल. कारण त्यांना ग्रामीण प्रश्नांची माहिती चांगली आहे. शेतीची जाण आणि कामाची सवयही आहे.
5) याशिवाय उद्योग करताना करात सवलत, स्वस्त कच्च माल आणि मनुष्यबळही मिळेल. पुन्हा समाजात मानसन्मान वाढतो आणि पैशासह आदर मिळतो. इतरांसाठी हे ग्रामीण उद्योजक प्रेरणास्त्रोत ठरतात.

👍 ग्रामीण उद्योजक कुणी व्हावं?

1) खेडय़ातल्या तारुण्याला संधी जास्त असली, तरी ज्यांना खेडय़ापाडय़ात जाऊन काम करायचंय, समाजासाठी कळकळ आहे त्या शहरी मुलांनाही संधी आहेच. मात्र हे नुस्तं काम नाही, फक्त धंदा नाही हे त्यानं व्यवसाय सुरू करताना लक्षात ठेवावं.
2) ग्रामीण उद्योजक व्यक्तिवादी-नफेखोर नसावा. त्याला फक्त मार्केटची नाही, तर सामाजिक प्रश्नांचीही जाण असावी. आपल्या कुटुंबाइतका समाजाचा विचार करण्याची व्यापक दृष्टीही असावी.
3) फक्त स्वत:चा नाही तर सगळ्यांचा विकास हे त्याचं तत्त्व असावं.

👍 समस्या कुठल्या?

1) ग्रामीण भागातीलच काय पण शहरी तारुण्यालाही या संधीची फारशी माहितीच नाही.
2) पायाभूत सुविधा नाहीत. वीज, पाणी आणि तंत्रज्ञान यांची आबाळ आहेच.
3) सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इच्छाशक्ती कमी पडते. ग्रामीण भागात आपण उद्योग सुरू करू शकतो असा विचारही तरुण करत नाही.
4) सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ट्रेनिंग नाही. व्यवसाय यशस्वी करायचा तर प्रशिक्षण हवं, ते प्रशिक्षणही मिळत नाही आणि अनेकजण नुस्त्या तक्रारी करत काही हातपाय हलवतही नाहीत.