पर्यावरणाचे महत्व:
पृथ्वी हा एक असा ग्रह आहे , जिथे सजीव सृष्टी आढळून येते . मग प्रश्न असा पडतो की ,आपण सर्व सजीव फक्त पृथ्वीवरच का राहतो ? आपल्या सूर्यमालेत अनेक ग्रह आहेत, मग तेथे सजीवसृष्टी का नाही ? तर याचे कारण असे आहे की , सजीवांना पूरक असलेले पर्यावरण सर्व ग्रहांपैकी फक्त पृथ्वीवरच आहे. सजीवांना जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आपल्याला पृथ्वीवरील पर्यावरणातून मिळतात .

सजीवांच्या नैसर्गिक परिसरास पर्यावरण असे म्हणतात. आपल्या सभोवताली असणार्‍या वस्तू, देखावा, माणसे, झाडे, पशु, पक्षी, नद्या , डोंगर, प्राणी, वारा, भूमी, इतर सजीव, पर्जन्यमान, उंची, तापमान, इ. मिळून निर्माण झालेली परिस्थिती म्हणजे 'पर्यावरण' होय. पर्यावरणामध्ये वनस्पती अथवा प्राणी नैसर्गिक परिसरात जगतात ,वाढतात .

पर्यावरण आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे कारण या पर्यावरणातून मानवाला आवश्यक असलेल्या गोष्टी प्राप्त होतात जसे की फळ, फुल, भोजन, इंधन इ . त्याचप्रमाणे सर्व सजीव सृष्टीला आणि मानवाला जीवन जगण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेले शुद्ध ऑक्सिजन हे पर्यावरणातूनच मिळते. तसेच पर्यावरण आपल्याला पिण्यासाठी व दैनंदिन वापरासाठी उपयुक्त असलेले पाणी, घरे बांधण्यासाठी लाकूड इ. सर्व काही देते . याचा उपयोग मानव आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करतो. पर्यावरण आपणांस आवश्यक असलेले संसाधने पुरवते.

सर्व सजीव व त्यांच्या भोवतीचे पर्यावरण एकात्मपणे परावलंबी असतात. मानवाचे जीवन हे पंच-तत्वांवर अवलंबून आहे. जसे की भूमी, जल, अग्नी, आकाश आणि वायू. मानव हा पर्यावरणातील अविभाज्य घटक आहे. कारण मानवाने आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून या पर्यावरणाकडून आपल्याला हवा तसा विकास करून घेतला आहे. परंतु आज आधुनिकीकरण पर्यावरणाला हानी पोहचवत आहे.

पर्यावरण आणि मानव यांचे परस्पर संबंध नेहमी बदलत असतात. आधुनिक तंत्रज्ञानापूर्वी मानव अतिशय साधेपणाने आयुष्य जगत होता. पण जसजशी माणसाची प्रगती होत गेली तसतशी माणसाने पर्यावणाचा ऱ्हास करायला सुरुवात केली. आज मोठ्या प्रमाणात लोकसंख्याही वाढत आहे. लोकसंख्या वाढत असल्यामूळे मानवाच्या गरजाही मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. मानव घरे बांधण्यासाठी जंगलतोड तसेच वृक्षांची तोड करू लागला त्यामुळे प्राण्यांचे आयुष्य धोक्यात आले आहे. जंगल तोड झाल्यामुळे मानवाची वस्ती वाढू लागली आणि पर्यावरणाचा समतोल बिघडू लागला आहे. त्यामुळे अनेक प्रदुषणाच्या समस्यासुद्धा उद्भवू लागल्या आहेत.

पृथ्वीवरील सजीवसृष्टीचे जीवन सुरळीत ठेवण्यासाठी आपल्याला पर्यावरणाची मौलिकता टिकवून ठेवण्याची अत्यंत गरज आहे . भारत देशामध्ये दरवर्षी ५ जून ला जागतिक पर्यावरण दिवस म्हणून साजरा केला जातो.पर्यावरण संरक्षण प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आपण आपल्या पर्यावरणाचे रक्षण केले पाहिजे. म्हणून संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे,

“वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षी ही सुस्वरे आळविती.”

खरोखरच हे वृक्ष आपले सगे – सोयरे, नातलग आणि मित्र कुटुंबातील आहेत. पर्यावरणाशिवाय सजीवसृष्टीचे काहीच अस्तिव नाही म्हणूनच निसर्ग संवर्धन करणे फार महत्वाचे आहे . एक उज्ज्वल आणि निरोगी भविष्यासाठी पर्यावरणाचे समतोल राखणे अनिवार्य आहे. त्यासाठी मानवाने पावसाच्या पाण्याचे संवर्धन केले पाहिजे, विजेचा किमान वापर, ऊर्जा संरक्षण तसेच टाकाऊ पासून टिकावू गोष्टींचा वापर केला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीने जास्तीत जास्त झाडे लावून या धरतीमातेला सुजलाम – सुफलाम बनवले पाहिजे.