पहिल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते?

न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे इ. स. १८७८ साली पुणे येथे झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे पहिले अध्यक्ष होते.

१८६५ साली न्या.रानडे यांनी मराठीत प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांचा आढावा घेतलेला दिसतो. त्यानुसार ४३१ गद्य आणि २३० पद्य पुस्तकांची निर्मिती झाल्याचे दिसते. ग्रंथ प्रसाराला चालना मिळण्याच्या हेतूने, तसेच त्यावर एकत्र येऊन विचार विनिमय करण्याच्या हेतूने न्या.रानडेयांनी लोकहितवादींच्या सहकार्याने १८७८ च्या मे महिन्यात ग्रंथकारांना एकत्र आणण्याचे ठरविले. त्यासाठीचे आवाहन ज्ञान प्रकाश (फेब्रुवारी ७ १८७८) मधे प्रसिद्ध झाले आणि या आवाहनानुसार मे ११ १८७८ रोजी सायंकाळी पुण्याच्या हिराबागेत मराठी ग्रंथकारांचे पहिले संमेलन भरले. याला पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन समजले जाते. या संमेलनाचे अध्यक्ष पद न्या.रानडे यांनीच भूषविले.

दुसरे ग्रंथकार संमेलन १८८५ साली पुण्यातच भरले. या संमेलनाला पहिल्याच्या मानाने चांगली म्हणजे शे-सव्वाशे नामवंत ग्रंथकारांनी उपस्थिती लावली होती. मे २१ १८८५ रविवार, दुपारी ४ वाजता पुणे सार्वजनिक सभेच्या (दाणे आळी, बुधवार पेठ) जोशी हॉलमध्ये भरले होते. या नंतर जवळ जवळ वीस वर्षांनी तिसरे ग्रंथकार संमेलन १९०५ च्या मे महिन्यात सातारा येथे भरले. लो.टिळकांचे एक सहकारी साताऱ्यातले सुप्रसिद्ध वकील र.पां.ऊर्फ दादासाहेब करंदीकर हे संमेलनाचे अध्यक्ष होते. २३ मे च्या केसरीत या संमेलनाचा त्रोटक वृत्तान्त प्रसिद्ध झाला होता. साताऱ्याचा पाठोपाठ चौथे ग्रंथकार संमेलन पुणे येथे २७-२८ मे १९०६ शनिवार, रविवार यां दिवशी सदाशिव पेठेत नागनाथपाराजवळच्या मयेकर वाड्यात भरले होते. हे संमेलन आधीच्या संमेलनांपेक्षा जास्त यशस्वी व विधायक स्वरूपाचे झाले. संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध कवी, ग्रंथकार आणि भाषांतरकार गोविंद वासुदेव कानिटकर होते. त्या वेळची अनेक मान्यवर ग्रंथकार मंडळी संमेलनासाठी एकत्र आलेली होती. निबंध वाचन, भाषणे, ठराव यामुळे संमेलन दोन दिवस गाजले.[१]