बाजार यंत्रणा ही मुख्यत्वे मागणी-पुरवठ्याच्या तत्त्वांवर चालते. प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ ॲडम स्मिथ यांच्या ‘अदृश्य शक्ती’च्या सिद्धांतानुसार बाजारातील किमती ही मागणी-पुरवठ्यावर अवलंबून असते आणि त्यानुसारच बाजारात संतुलन प्राप्त होते. बहुतांश सनातनवादी अर्थतज्ज्ञांनी बाजारात पूर्ण निर्हस्तक्षेपाच्या धोरणाचा पुरस्कार केला. त्यांच्या मते, बाजार यंत्रणेच्या साहाय्याने मिळणारे संतुलन हे कायमच संसाधनांचे पर्याप्त वितरण घडवून आणणारे असते. तसेच बाजार यंत्रणेतून होणारा परिणाम हा पॅरोटो (कार्यक्षम) इष्टतम/पर्याप्त असतो; परंतु गेल्या काही दशकांमध्ये बाजारबद्दलचा हा दृष्टीकोन बदलला आहे. बरेचदा बाजार यंत्रणेमार्फत होणारा हा परिणाम पर्याप्त नसतो. अर्थव्यवस्थेतील समस्या सोडविण्याच्या दृष्टिकोनातून बाजार यंत्रणेचे अपयश दिसून येते. त्याचप्रमाणे उत्पन्नातील विषमता, दारिद्र्य, प्रदूषण, अपूर्ण माहिती व अपूर्ण बाजार यांसारख्या समस्यांनाही बाजार यंत्रणेच्या माध्यमातून कोणतेही ठोस असे उत्तर मिळालेले दिसून येत नाही.