जन्म-मृत्यू दाखले काढण्यासाठी नागरिकांना होणारी अडचण पाहता आरोग्य मंत्रालयाकडूनहे काम आता ऑनलाइन पध्दतीने होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. श्यामसुंदर निमगडे यांनी दिली. राज्यभरात टप्प्या-टप्प्याने ही यंत्रणा सुरू करण्यात येणार असून, जिल्ह्यात १ जानेवारीपासून या उपक्रमाची सुरुवात होणार आहे.
त्यानिमित्त जिल्हा परिषदेत गुरुवारी नगरपरिषदेच्या निबंधकांना या ऑनलाइन पध्दतीबाबत प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी नंदकुमार वाणी यांच्यासह जिल्ह्यातील नगरपरिषदेतील निबंधक उपस्थित होते. अजुन याबाबत जिल्ह्यातील ग्रामसेवकांनाही प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्ह्यात टप्प्या-टप्प्यानिहाय ही यंत्रणा सुरू करण्यात येणार आहे. यामुळे जन्म-मृत्यू दाखला काढताना नागरिकांचे होणारे हाल थांबणार आहेत.
जन्म-मृत्यू कायदा १९६९ नुसार ज्या ठिकाणी जन्म किंवा मृत्यू झाला, त्याच ठिकाणाहून हा दाखला काढण्यात येत असतो. यामुळे अनेकदा केवळ हा दाखला काढण्यासाठी परराज्यातही जावे लागत होते. परंतु ही यंत्रणा आता संपूर्ण भारतभर सुरू करण्यात येत असल्यामुळे मूळगावी जाऊन दाखला काढण्यासाठीचा त्रास नागरिकांना होणार नाही. जिल्ह्यातील ग्रामपंचायत केंद्र, संग्राम केंद्र व सेतू सुविधा केंद्रावर ही माहिती मिळणार आहे. नोंदणी करताना स्वतः हजर राहणे अपेक्षित असले, तरी दाखला मिळविताना ऑनलाइन मिळू शकणार आहे.
मृत्यूचा दाखला कुठे मिळतो?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.