सामाजिकनियंत्रण(सोशल कंट्रोल). समाजावर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष अंकुश ठेवणारी व्यवस्था. सामाजिक नियंत्रण या संकल्पनेचा अभ्यास हा समाजशास्त्र या संज्ञेच्या उगमापासूनच त्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे. समाज सामाजिक नियंत्रणाची व्यवस्था प्रस्थापित करतो.

समाजशास्त्रज्ञ बॉटमोर यांनी ‘सामाजिक नियंत्रण’ या संकल्पनेची व्याख्या अचूक दिली आहे. ‘जी मूल्ये आणि नियमने यांच्या योगाने व्यक्तिव्यक्तींमधील आणि समूहांमधील ताण आणि संघर्ष विघटित करून अगर प्रशमित करून एखाद्या मोठ्या समूहाची ऐक्यभावना टिकविली जाते, त्या मूल्यांच्या व नियमनांच्या समुच्च्याला सामाजिक नियंत्रण ही संज्ञा दिली जाते’. समाजातील बहुसंख्य लोक समाजातील प्रमाणित नियम व मूल्यांना अनुरूप वर्तन करतात; तर काही व्यक्ती हे नियम आणि प्रमाणित मूल्ये झिडकारतात. या अपमार्गी (मार्गच्युत) वर्तनावर नियंत्रण ठेवण्यासाठी समाजात जी यंत्रणा कार्यतत्पर असते, तिला सामाजिक नियंत्रण म्हणतात. सामाजिक स्वास्थ्य टिकून राहण्यासाठी सामाजिक नियंत्रणाची अपरिहार्यता नाकारता येत नाही.

बहुविध प्रकारचे सामाजिक संबंध असणाऱ्या व्यक्तींवर नियंत्रण ठेवले, तरच त्यांच्यातील परस्परसंबंधांमध्ये एकसूत्रता येते;व्यक्तींमधील भेद कमी होतात, यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अनौपचारिक व औपचारिक नियमने आवश्यक असतात. सामाजिक स्वास्थ्य, स्वार्थी वृत्तीचे निराकरण, सामाजिक सुरक्षितता, विषमता दूर करणे आणि लोकांत सामाजिक कर्तव्याची जाणीव निर्माण करणे हे सामाजिक नियंत्रणाचे महत्त्वाचे उद्देश होत. सामाजिक नियंत्रणाचे अनौपचारिक व औपचारिक हे दोन प्रमुख प्रकार होत. अनौपचारिक सामाजिक नियंत्रणात अधिकतर धार्मिक परंपरा व रीतिरिवाज, रुढी, लोकाचार आणि लोकनीती ही साधने प्रभावी ठरतात. या साधनांमध्ये धर्म हा सामाजिक नियंत्रणाचा सर्वांत प्रभावी प्रकार होय. समाजात धर्माचे महत्त्व विलक्षण आहे. धर्माने मानवी जीवनात कायमस्वरुपी स्थान पटकाविले आहे. सांस्कृतिक मानवशास्त्रज्ञांच्या मते गेल्या दीडशे–दोनशे वर्षांत पृथ्वीवरील आदिम समाजांपासून ते औद्योगिक आणि वैज्ञानिक कांती पूर्ण झालेल्या समाजापर्यंत धर्मसंस्था नाही,असा एकही समाज आढळत नाही. समाजात धर्म न मानणाऱ्या नास्तिक व्यक्ती व संघटना अपवादादाखलच सापडतात. जेथे निसर्गनियमांचे पूर्णतः आकलन होत नाही, तिथे मानवी मन निसर्गातील अलौकिक शक्तीची संकल्पना करते. ईश्वरोपासनेची फलिते किंवा तज्जन्य चमत्कार निसर्गनियमाला अपवाद असले, तरी निसर्गनियम आणि धर्मनियम हे एकमेकांत गुंतलेले असतात, त्यांचा संबंध गृहीत धरलेला असतो. निसर्गनियमांचा आधार घेऊन अलौकिक शक्ती कार्यरत असतात, निसर्गाचे नियंत्रण त्या करीत असतात, म्हणून त्या श्रेष्ठ मानल्या आहेत. या सर्व श्रेष्ठ शक्तींच्या नियामकतेचा सामाजिक नियमबद्घतेशीधर्मसंस्थेने संबंध जोडलेला आहे.

सामाजिक जीवनाला व्यापक नियमबद्घतेची आवश्यकता असते. व्यापक सामाजिक नियम माणसेच बनवितात. माणसांचेपरस्परावलंबित्व व परस्परांवरील क्रिया–प्रतिक्रिया अशा नियमांच्या पालनानुरोधाने घडत असतात. या नियमांच्या पाठीशीदैवी संकेतांचे बळ आवश्यक ठरते. आपले सामाजिक हितसंबंध नियमनाच्या अभावी बिघडतात, म्हणून माणसापेक्षा वरिष्ठ अशीनिसर्गनियामक अलौकिक शक्ती माणसांनी संकल्पिलेली असते. तीच धर्म या संकल्पनेत अनुस्यूत असून त्याच संकल्पनेच्याआधारावर सामाजिक जीवनाचे नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला जातो. रुढी, लोकाचार, लोकनीती, परंपरागत चालीरीती यासर्व संकल्पना धर्माच्या आधीन असून त्या अनौपचारिक सामाजिक नियंत्रणातील महत्त्वाची साधने होत. या अनौपचारिकसाधनांपैकी नैतिकता किंवा नीती यांना विशेष महत्त्व आहे. प्रत्येक मानवी समाजाच्या नीतिविषयीच्या काही कल्पना असतात.नीती आणि धर्म यांच्यात फरक असतो. इंद्रियजन्य सुखदुःखांच्या, अर्थात वैषयिक सुखदुःखांच्या, बंधनातून मुक्त आत्मस्थितीम्हणजे परमशांती वा स्थितप्रज्ञता. सुख, मोक्ष, निर्वाण किंवा आत्मानंद हे भारतीय नीतिशास्त्राचे मुख्य उद्दिष्ट होय. योग्य कृत्यकिंवा विहित कृत्य ही नैतिकतेतील मूलभूत संकल्पना असून कित्येक कृत्ये किंवा कित्येक प्रकारची कृत्ये स्वरूपतःचमाणसावर बंधनकारक असतात. नैतिक नियमांना अनुसरून माणसाने वागावे व जगावे. मानवाचे इतर मानवांशी संबंध कसेअसावेत–माणुसकीचे, प्रेमाचे, सचोटीचे, सरळ आणि निर्भेळ–याचा विचार नैतिकतेत केलेला असतो. हे संबंध मानवीमूल्यांवर–समता, मानवता, सामाजिक न्याय– किंवा योग्य काय, अयोग्य काय यांवर अवलंबून असतात. मानवाच्याएकमेकांविषयी असलेल्या व्यवहारांचा सारासार विचार करून त्यावर आधारलेल्या कल्पनांना नीतिकल्पना म्हणतात. दैनंदिनसामाजिक जीवनातील माणसांच्या वर्तनावर नैतिक संहिता नियंत्रण ठेवते. त्यामुळे सदाचार आणि मानवता यांचे भान ठेवलेजाते. व्यक्तींनी स्वतःवरच बंधने घालून घेतलेली असतात. त्यामुळे त्याविरुद्घ वर्तन केले, तर ‘अनैतिक’ असा शिक्का बसतोआणि सामाजिक जीवनातून ती व्यक्ती उतरते. हेगेलच्या मते, नीतीची आत्मजाणीव असलेली व्यक्ती ही एका समाजाची, एकासंस्कृतीची घटक असते. कुटुंब, राज्यसंस्था, व्यवसाय इ. सामाजिक संस्था, प्रचलित रुढी, संकेत या सर्वांद्वारा सामाजिकजीवन मूर्त झालेले असते आणि त्याच्यातून सामाजिक कल्याण साधले जाते.