सविनय कायदेभंगाची चळवळ : सत्ताधीश वा शासनाच्या आज्ञांचे पालन करण्यास अहिंसात्मक मार्गाने नकार देणारी सामूहिक रीत्या केलेली चळवळ. तिला सहनशीलतेतून उद्‌भवलेली प्रतिक्रिया असेही म्हणतात. या चळवळीचा मुख्य उद्देश शासनावर नैतिक दबाव आणून विशेष हक्क वा सवलती मिळविणे हा असतो.

सविनय कायदेभंग चळवळ ही भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक चळवळ असून महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली तिची सुरुवात राष्ट्रीय सभेच्या आदेशाने फेब्रुवारी १४ १९३० रोजी झाली होती.

भारतीय स्वातंत्र्यासाठी झटणाऱ्या राष्ट्रसभेला पूर्ण स्वराज्य हवे होते, पण ब्रिटीश सरकार ते द्यायला तयार नव्हते. महात्मा गांधींनी तडजोड म्हणून संपूर्ण दारूबंदी, ५० टक्के शेतसारा माफी, मिठावरील कर रद्द, ५० टक्के लष्कर खर्चाची कपात, देशी मालाला संरक्षण, राजकीय कैद्यांची मुक्तता अशा एकूण अकरा मागण्या ब्रिटीश सरकारपुढे मांडल्या होत्या. सरकारने महात्मा गांधींच्या या मागण्यांकडे दुर्लक्ष करून दडपशाही सुरू केली. त्यास प्रत्युत्तर म्हणून १४ फेब्रुवारी १९३० रोजी राष्ट्रसभेने महात्मा गांधींच्या नेत्वृत्वाखाली सविनय कायदेभंगाचा जनतेला आदेश दिला. मिठावर लादलेला कर महात्मा गांधींना मान्य नव्हता; त्यामुळे या कायदेभंगाची चळवळ मिठाचा सत्याग्रह करून करावी, अशी कल्पना त्यांना सुचली व मार्च १२ १९३० रोजी साबरमतीच्या आश्रमातून महात्मा गांधी मिठाच्या सत्याग्रहासाठी दांडीयात्रेला निघाले. एप्रिल ५, १९३०ला त्यांनी मिठाचा कायदा मोडला.

परिणाम:
सविनय कायदेभंगाच्या चळवळीमुळे जनतेच्या देशभक्तीला मोठे उधाण आले. लोक सरकारी जागांचे राजीनामे देऊ लागले. तळागाळातील हजारो लोक सत्याग्रहात सामील झाले. सैन्यात राष्ट्रभक्ती वाढली. वायव्य सरहद्द प्रांतातही देशभक्तीचे वारे पसरले. या सर्वांचा परिणाम म्हणून ब्रिटीश सरकारने पंतप्रधान मॅक्डोनाल्ड यांच्या अध्यक्षतेखाली लंडन येथे पहिली गोलमेज परिषद बोलावली.