भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास :
भारत इंग्रजी अंमलाखाली आल्यानंतर स्वातंत्र्य संपादनार्थ घडलेला इतिहास. बंगालचा नवाब सिराज उद्दौला याचा बंगालमधील प्लासी या गावाजवळ २३ जून १७५७ रोजी झालेल्या लढाईत [⟶ प्लासीची लढाई] ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने पराभव केला आणि कलकत्ता शहर व २४ परगणा जिल्हा यांचे चिमुकले राज्य स्थापिले. या राज्याचा विस्तार शीख सत्ता नष्ट होईपर्यंत (१८४९) चालू राहिला. अखेरीस भारताच्या इतिहासातील एक सर्वांत मोठे व बलाढ्य असे ब्रिटिश साम्राज्य उभे राहिले . पाचही खंडांत पसरलेल्या विशाल ब्रिटिश साम्राज्याचा हिंदी साम्राज्य हा एक भाग होता. त्याची इतरही अनेक वैशिष्टये होती : आधीच्या सर्व परकी राज्यकर्त्यांनी येथे स्थायिक होऊन भारतीय शेती व उद्योगधंद्यांना प्रोत्साहन दिले. त्यामुळे आर्थिक भरभराट होत राहिली. ब्रिटिश काळात परिस्थिती उलटी झाली. ग्रेट ब्रिटनमधील कारखान्यांत तयार होणाऱ्या मालाला भारत ही हुकमी बाजारपेठ मिळाली. त्यामुळे इथले उद्योग बुडाले, जमिनीचा सारा वाढला आणि शेतीसाठी दरवर्षी जी कर्जे घ्यावी लागत, त्यांचे लेखी व्यवहार सुरू झाले. या व्यवहारात निरक्षर शेतकऱ्यांच्या जमिनी सावकारांच्या मालकीच्या बनल्या. देशाचा कोणत्या ना कोणत्या तरी भागात दुष्काळ आणि भूकबळी ही नित्याची बाब होऊन बसली.

या प्रचंड साम्राज्यविरुद्धचे स्वातंत्र्य आंदोलन जवळजवळ १८६ वर्षे चालले. या दीर्घ काळात येथील समाजव्यवस्थेत, राजकीय विचारसरणीत आणि नेतृत्वात क्रांतिकारक बदल होत गेले. त्या दृष्टीने स्वातंत्र्य चळवळीचे दोन महत्त्वाचे टप्पे पडतात : (१) कंपनी सरकारचा कालखंड (१७५७ ते १८५८) आणि (२) ब्रिटिश साम्राज्याचा कालखंड (१८५८ ते १९४७). १९४७ पूर्वीची २०-२५ वर्षे वगळली, तर ब्रिटिशांच्या मांडलिक देशी संस्थानांतून म्हणण्यासारखी स्वातंत्र्य चळवळ अशी झालीच नाही. १९४७ नंतर चिमुकल्या फ्रेंच वसाहतींतून फ्रेंचांनी समंजसपणे सत्ता सोडली (1954), उलट भारत सरकारला पोर्तुगीजांपासून दीव, दमण आणि गोवा जिंकून घ्यावे लागले (१९६२). [⟶ पोर्तुगीज सत्ता, भारतातील फ्रेंच सत्ता, भारतातील].