भारताचा स्वातंत्र्यलढा
भारतीय स्वातंत्र्य चळवळ ही ऐतिहासिक घटनांची मालिका होती, ज्याचा अंतिम उद्देश भारतातील ब्रिटीश राजवट संपवणे हा होता. हा स्वातंत्र्यलढा १८५७ ते १९४७ या काळात चालला. भारतीय स्वातंत्र्यासाठी पहिली राष्ट्रवादी क्रांतिकारी चळवळ बंगालमधून उदयास आली होती. प्रमुख राष्ट्रीय नेत्यांनी स्थापन केलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने या चळवळीचा पाया भक्कम केला. हे नेते भारतीय लोकांच्या नागरी सेवा परीक्षांना बसण्याच्या अधिकारासाठी तसेच अधिक आर्थिक अधिकार मिळवण्यासाठी प्रयत्नशील होते. २० व्या शतकाच्या पूर्वार्धात लाल बाल पाल, अरविंद घोष आणि व्हीओ चिदंबरम पिल्लई यांनी स्वराज्यासाठी अधिक मूलगामी दृष्टीकोन पाहिला.
ब्रिटिश भारत

१९२०मधील स्वराज्य संघर्षाच्या शेवटच्या टप्प्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने महात्मा गांधी यांच्या अहिंसा आणि सविनय कायदेभंगाच्या धोरणाचा अवलंब केला. रवींद्रनाथ टागोर, सुब्रमण्यम भारती आणि बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांसारख्या अनेक विचारवंतांनी देशभक्तीची भावना जनमानसात पसरवली. तर सरोजिनी नायडू, प्रीतिलता वड्डेदार आणि कस्तुरबा गांधी यांसारख्या महिला नेत्यांनी महिलांना स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय समाजातील वंचित घटकांना मदत केली.

तर काही नेत्यांनी सशस्त्र क्रांतीचा अवलंब केला. सशस्त्र क्रांती विशेषतः रौलेट कायद्यानंतर लोकप्रिय झाली. या कायद्याने लोकांना अनिश्चित काळासाठी तुरुंगात डांबण्याची परवानगी ब्रिटिश सरकारला परवानगी दिली होती. या कायद्याविरोधात संपूर्ण भारतभर विशेषतः पंजाब प्रांतात निषेध झाला. पंजाबमधील जालियनवाला बाग हत्याकांडाद्वारे ब्रिटिशांनी हे आंदोलन हिंसकपणे दडपले. भगतसिंग, शिवराम राजगुरू, सुखदेव थापर, चंद्रशेखर आझाद आणि सुभाषचंद्र बोस यांसारख्या क्रांतिकारकांनी काँग्रेसच्या निष्क्रियतेमुळे निराश होऊन हिंसक मार्गांचा अवलंब सुरू केला. बोस यांनी अक्षीय शक्तींशी स्वतःला प्रसिद्धी दिली आणि आझाद हिंद सेनेची स्थापना केली. यादरम्यान भगतसिंग, राजगुरू, सुखदेव आणि चंद्रशेखर आझाद यांनी प्रमुख ब्रिटिश अधिकाऱ्यांची हत्या केली आणि सरकारी इमारतींवर बॉम्बस्फोट केले.

भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये सतत वैचारिक उत्क्रांती होत होती. मूलत: वसाहतविरोधी असलेली ही चळवळ धर्मनिरपेक्षता, लोकशाही, प्रजासत्ताक आणि नागरी-स्वातंत्र्यवादी अशा विचारांच्या राजकीय संरचनेसह स्वतंत्र, आर्थिक विकासाच्या दृष्टींनी पूरक होती. १९३० नंतर या लढ्याने एक मजबूत समाजवादी प्रवृत्ती स्वीकारली. स्वातंत्र्य आंदोलनामुळे शेवटी भारतीय स्वातंत्र्य कायदा, १९४७ तयार होऊन भारतातील ब्रिटिश राजवट संपुष्टात आली आणि पाकिस्तानची निर्मिती झाली.

२६ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधान लागू होऊन भारतीय प्रजासत्ताकची स्थापना होईपर्यंत हा देश ब्रिटिश साम्राज्याचाच एक भाग होता. १९५६ मध्ये पाकिस्तानने स्वतःचे संविधान स्वीकारले; तोपर्यंत तो ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता. तर १९७१ मध्ये पूर्व पाकिस्तानने बांगलादेश म्हणून स्वतःचे स्वातंत्र्य घोषित केले.