स्वराज्य आणि मराठा सामाज्राचा विस्तार होत असताना, शिवाजी महाराजांनी सागरी सीमांचे रक्षण करण्यासाठी शक्तिशाली आरमार उभारले. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक (father of Indian Navy) असे म्हटले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म पुणे जवळील शिवनेरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला होता.
शिवाजी महाराजांच्या आरमारी मोहिमा
महाराजांनी बसरूरच्या स्वारीत स्वतः मराठी आरमाराचे नेतृत्व केले. ‘दर्यास पालाण राजियांनी घातले’ असे सभासदाने या स्वारीचे वर्णन लिहून ठेवले आहे. एकदा दंडराजपुरीवर महाराजांनी स्वतः ‘गुराब’ व होड्यांच्या आरमारासह चढाई केली परंतु ऐनवेळी समद्रात वादळ झाल्याने त्यांना माघार ह्यावी लागली. सिद्धी हा एक प्रबळ असा आरमारी शत्रू होता. शिवाजी राजांचे आरमाराने अनेकदा सिद्धीवर स्वारी करण्याचे प्रयत्न या ना त्या कारणाने फसले. परंतु सिद्धीच्या मराठी राज्यात लुटालुट करण्याच्या कारवायाना मात्र बर्याचअंशी आळा बसला. जंजिर्याची अभेद्य तटबंदी भेदता आली नाही हे एक शल्य महाराजांना शेवटपर्यंत बोचत राहिले.
पोर्तुगीज हे सागरावरील एक प्रबळ सामर्थ्यवान सत्ता होती. पोर्तुगालचा राजा हा सातासमुद्राचा धनी अशी पोर्तुगीजांची धारणा होती. त्यामुळे सागरावरून व्यापारउदीय करण्यास पोर्तुगाल राजाचा परवाना ‘कार्ताज’ घेण्याची आवश्यकता त्यावेळी सर्व व्यापारी व इतर गलबताना लागत असे. यातून खुद्द मोगल बादशहाचीही सुटका नसे. शिवाजीराजांच्या गलबतांनी सुद्धा ‘कार्ताज’ घेतले पाहिजे असा अट्टाहास पोर्तुगीजांनी धरला होता. त्यामुळे मराठी आरमार व पोर्तुगीज आरमार यांच्यातील संघर्ष अटळ बनला होता. त्यातूनच कुडाळ प्रांतातील वाडीचा सावंत व पेडणे, भतग्राम, सत्तर, मणेरी इत्यादी भागातील देसाई यांच्याशी पोर्तुगीज संधान बांधून होते व वेळोवेळी महाराजांविरुद्ध कटकारस्थाने करीत असा संशय महाराजांना होता. त्यातून पोर्तुगीजांची धार्मिक असहिष्णुता व गोव्यातील धर्मच्छलाच्या बातम्या महाराजांच्या कानावर येत होत्या. त्यामुळेच कदाचित शिवाजीराजे पोर्तुगीजांवर खार खाऊन होते व संधीची वाट पहात होते. पोर्तुगीजांच्या या आगळिका लक्षात घेऊन (इ. सन १६६७) नोव्हेंबर दि. १९ ते २० च्या रात्रौ) पाच हजार पायाळ व एक हजार घोडदळ घेऊन बारदेश व साष्टी प्रांतावर चाल करून पोर्तुगीजांना धडा शिकवला. त्यामुळे पोर्तुगीजांच्या स्वःसार्वभौमत्वाच्या कल्पनेला बरीच मुरड पडली. १० फेब्रुवारी, १६७० च्या तहानुसार पोर्तुगीजांनी धान्य, मीठ इत्यादी पदार्थ घेऊन जाणार्या महाराजांच्या होड्यांवर निर्बंध घातला जाणार नाही हे त्यानी मान्य केले. वास्तविक शिवाजीराजांना गोवा पोर्तुगीजांच्या जोखडापासून स्वराज्यात सामील करून घ्यायचे मनात होते. परंतु पोर्तुगीजांना नशिबाची साथ लाभली व गोवा त्यांच्या ताब्यात राहिला. एकदा तर नार्वे येथील सप्तकोटेश्वर देवस्थानच्या जिर्णोद्धाराचे कार्य आरंभून राजांनी पैलतडी गोवा राजधानीत आपली माणसे घुसवण्यास प्रारंभ केला होता. परंतु बातमी फुटली व व्हॉईसरॉयने महाराजांच्या वकीलाला बोलवून या सर्व माणसाना हद्दपार केले. मात्र पोर्तुगीजांच्या सागरी सत्तेला बराचसा प्रतिबंध महाराजांच्या लष्करी व आरमारी सामर्थ्यामुळे लागला.
३ शिवछत्रपतींना भारतीय आरमाराचे जनक का म्हणतात?
✅ Updated recently