पुणे जिल्ह्यातील किल्ले व गड

पुणे जिल्ह्यातील पुरंदर, सिंहगड, शिवनेरी, रायरेश्वर, राजमाची, राजगड, विसापूर, लोहगड, मल्हारगड, तोरणा, दुर्ग-ढाकोबा, तुंग, तिकोना, जीवधन, कोरीगड-कोराईगड, चावंड, भोरगिरी, सिंदोळा, चाकणचा किल्ला, रायरीचा किल्ला, हडपसर हे किल्ले पुणे जिल्ह्यात प्रसिद्ध आहेत. .

१) पुरंदर किल्ला (ता.पुरंदर) : हा किल्ला पुण्याचा अग्नेय दिशेला व सासवडच्या नैऋत्य दिशेला आहे. गडाच्या पूर्वेला बहुतांश प्रदेश सपाट आहे. तर पश्चिमेचा प्रदेश डोंगराळ आहे. या किल्ल्याच्या वायव्येला सिंहगड तर पश्चिमेला राजगड आहे. काही वर्षे हा किल्ला शिवाजी महाराजांची राजधानी होती. तसेच हा किल्ला पेशव्यांची पहिली राजधानी होता. पुराणात या डोंगराचे नाव इंद्रनील पर्वत आहे. हनुमंताने द्रोणागिरी उचलून नेत असताना त्या पर्वताचा काही भाग खाली पडला तोच हा इंद्रनील पर्वत असे मानले जाते. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म या किल्ल्यावर १६६५ साली झाला. तसेच सवाई माधवरावांचा जन्मही याच किल्ल्यावर झाला. याच किल्ल्यावर मुरारबाजीने दिलेरखानशी निकराची झुंज दिली. या गडावरील बिनी दरवाजा, पुरंदरेश्वर मंदिर, रामेश्वर मंदिर, दिल्ली दरवाजा, खंदकडा, पद्मावती तळे, शेंदऱ्या बुरुज, केदारेश्वर इ. ठिकाणे पाहण्यासारखी आहेत.

२) सिंहगड किल्ला (ता. हवेली) : पुण्याच्या नैऋत्येला साधारणत: २५ किमी. अंतरावर हवेली तालुक्यात डोणजे गावात हा किल्ला आहे. सह्याद्रीच्या पूर्व शाखेवर पसरलेल्या भुलेश्वराच्या रांगेवर हा गड आहे. दोन पायऱ्यासारखा दिसणारा खंदकाचा भाग व दूरदर्शनचा उभारलेला मनोरा यामुळे पुण्यातून कुठूनही तो दृष्टीस पडतो. सिंहगडचे मूळ नाव कोंढाणा होतो. शिवाजी महाराजांचे विश्वासू सरदार तानाजी मालुसरे यांना या किल्ल्यावर लढताना वीरमरण आले आणि प्राणाचे बलिदान देवून हा किल्ला जिंकल्यामुळे शिवाजी महाराजांनी ‘गड आला पण सिंह गेला’ हे वाक्य उच्चारले. पुढे त्यांनी गडाचे कोंढाणा हे नाव बदलून सिंहगड असे ठेवले. याच गडावर राजाराम महाराजांचे निधन झाले. या गडावरील दारूचे कोठार, टिळक बंगला, कोंढाणेश्वर, श्री अमृतेश्वर भैरव मंदिर, देवटाके (पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग), कल्याण दरवाजा, उदयभानचे स्मारक, झुंजार बुरुज, डोणगिरीचा उर्फ तानाजी कडा, राजाराम महाराजांचे स्मारक, नरवीर तानाजीचे स्मारक इ. ठिकाणे पाहण्यासारखी आहेत.

३) शिवनेरी किल्ला (ता.जुन्नर) : शिवनेरी हा प्राचीन किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर गावाजवळ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म याच शिवनेरी किल्ल्यावर झाला. या किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदीर व जिजाबाई आणि बालशिवाजी यांच्या प्रतिमा आहेत. या किल्ल्याचा आकार शंकराच्या पिंडीसारखा आहे. किल्ल्यात शिवाईदेवीचे मंदिर असल्यामुळे त्यास शिवनेरी हे नाव पडले. या किल्ल्यावर शिवाई देवीचे मंदीर, अंबरखाना, पाण्याची टाकी, बौद्धांच्या गुहा, शिवरायांचे जन्मस्थान इ. ठिकाणे प्रेक्षणीय आहेत.

४) रायरेश्वर किल्ला (ता.भोर) : पुणे जिल्ह्यातील वाई-सातारा डोंगर रांगेमधे भोर जवळ हा किल्ला आहे. शिवरायांनी स्वराज्याची शपथ याच रायरेश्वराच्या डोंगरावर घेतली होती. येथील रायरेश्वराचे मंदीर प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात हे रायरेश्वराचे पठार रानफुलांनी भरून जाते.

५) राजमाची : उल्हास नदीच्या खोऱ्याच्या प्रदेशात मुंबई-पुणे लोहमार्गावर लोणावळ्याच्या वायव्येस राजमाची किल्ला वसलेला आहे. राजमाची किल्ल्याच्या पश्चिम उतारावर बौद्ध लेणं आहे. यालाच कोंढाणे लेणी असे म्हणतात. राजमाची किल्ल्यास पूर्वी ‘कोकणचा दरवाजा’ संबोधण्यात येत असे.

६) राजगड (ता.वेल्हे) : राजगड हा किल्ला पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यातील गुंजवणे या गावात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची सुरुवातीची २५ वर्षे राजगड हीच राजधानी होती. राजाराम महाराजांचा जन्म ही याच किल्ल्यावर झाला. महाराणी सईबाई यांची समाधी येथेच आहे. राजगडाकडे कोणत्याही बाजूने येताना एखादी टेकडी किंवा नदी ओलांडावीच लागते. एवढी सुरक्षितता होती म्हणूनच राजांनी राजगड ही राजधानी म्हणून निवडली. नंतर राज्यकारभारासाठी गडावरची जागा अपुरी पडु लागल्याने राजांनी राजधानी त्या मानाने ऐसपैस-दुर्गम अशा रायगडावर नेली.

७) विसापूर (ता.मावळ) : मावळ तालुक्यात लोहगडच्या शेजारी असलेला किल्ला म्हणजे विसापूर होय. हा किल्ला भाजे गावात गेल्यावर दिसतो. पायऱ्याच्या सहाय्याने किल्ल्यावर जाताना एक मारुतीचे मंदीर आहे.

८) लोहगड (ता.मावळ) : लोहगड किल्ला भाजे व भेडसे बौद्ध लेण्यांच्या जवळच आहे. ही लेणी ज्या काळात निर्माण झाली त्याही आधी किल्ल्यांची निर्मिती झाली असावी असे मानले जाते. या गडावर गणेश दरवाजा, नारायण दरवाजा, हनुमान दरवाजा, महादरवाजा पाहण्यासारखे आहे.

९) मल्हारगड : महाराष्ट्राच्या सर्व किल्ल्यांमध्ये सर्वात शेवटी बांधला गेलेला किल्ला म्हणून मल्हारगडचा उल्लेख केला जातो. पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेकडे वेल्हे तालुक्यातून सह्याद्रीच्या मूळ रांगेचे दोन फाटे फुटतात. एका डोंगर रांगेवर राजगड, तोरणा हे किल्ले आहेत. तर दुसरी डोंगररांगेला भुलेश्वर रांग म्हणतात. या रांगेवर पुरंदर, वज्रगड, सिंहगड, मल्हारगड हे किल्ले आहेत. मल्हारगडच्या पायथ्याला असणाऱ्या सोनोरी गावामुळे या गडाला सोनोरी म्हणूनही ओळखले जाते. या किल्ल्याची बांधणी पेशव्यांचे सरदार पाणसे यांनी केली. पाणसे हे पेशव्यांच्या तोफखान्याचे प्रमुख होते. या पाणसेंचा चिरेबंद वाडा किल्ल्याखालच्या सोनेरी गावामध्ये आहे.

१०) तोरणा (ता.वेल्हे) : हा किल्ला पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच डोंगर आहे. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करीत असताना घेतलेला पहिला किल्ला म्हणजे तोरणा. शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे तोरण या गडावर बांधले म्हणून या गडाचे नाव ‘तोरणा’ असे पडले. गडावर तोरणा जातीची पुष्कळ झाडे असल्यामुळे गडाचे नाव ‘तोरणा’ पडले असेही मानले जाते. तोरणा किल्ल्याचा विस्तार मोठा असल्यामुळे शिवाजी महाराजांनी त्याचे नाव ‘प्रचंडगड’ असे ठेवले.

११) दुर्ग-ढाकोबा : ढाकोबा जवळच दुर्ग हा एक जुळा किल्ला आहे. जुन्नर परिसरातील घाटाच्या ) माळशेज डोंगररांगेत हा किल्ला आहे. किल्ल्यावर पाहण्यासारखे ठिकाणे म्हणजे कोकणात उतरणारा रौद्र कडा आणि ढाकोबाचे मंदीर. शेजारीच दाऱ्या घाट नावाची कोकणात उतरणारी घाट वाट आहे.

१२) तुंग किल्ला (ता.मुळशी) : पवन मावळ प्रांतातील या किल्ल्याचा पूर्वी बोरघाटामार्गे चालणाऱ्या वाहतूकीवर नजर ठेवण्यासाठी उपयोग होत असे. या किल्ल्यावर तुंगी देवीचे मंदीर आहे.

१३) तिकोणा (ता.मुळशी) : पवना नदीवरील धरणापासून ३ ते ४ किमी. अंतरावर हा किल्ला आहे. किल्ल्याच्या त्रिकोणी आकारामुळे याला तिकोणा असे नाव पडले. येथील गडमाथ्यावर त्र्यंबकेश्वर महादेवाचे छोटेखानी मंदीर, बालेकिल्ल्याच्या खालील भागात तुळजाईचे मंदीर ही ठिकाणे पाहण्यासारखी आहेत.

१४) जीवधन : घाटघरच्या परिसरात असलेला हा किल्ला प्राचीन नाणे घाटाच्या व्यापारी मार्गाच्या संरक्षणासाठी उभारण्यात आला होता. नाणे घाटापासून जीवधन किल्ला अगदी जवळ आहे. जीवधन किल्ल्याच्या पायथ्याचे गाव म्हणजे घाटघर होय. या गडाच्या टोकाला सुमारे २००० फुट उंचीचा ‘वानरलिंगी’ नावाचा एक सुळका लक्षवेधी आहे.

१५) कोरी-कोराई गड : लोणावळ्याच्या पूर्वेला साधारणत: २५ किमी. अंतरावर हा किल्ला आहे. गडावर कोराई देवीचे मंदीर आहे.

१६) चावंड : जुन्नर तालुक्यातून कुकडी नदीच्या उगमाजवळ चावंडचा किल्ला आहे. याला चावंडगड किंवा प्रसन्नगड असेही म्हणतात. या किल्ल्याचा उल्लेख जुंड म्हणूनही केला जातो.

१७) भोरगिरी किल्ला : भिमा नदीच्या खोऱ्यामध्ये भवरगिरी किंवा भोरगिरी नावाचा किल्ला आहे. या किल्ल्याच्या पायथ्याला भोरगिरी नावाचे लहानसे गाव ही आहे. राजगुरुनगर पासून साधारणत: ५५ किमी. अंतरावर हा किल्ला आहे.

१८) सिंदोळी किल्ला : हा किल्ला जुन्नरच्या वायव्येला माळशेज घाटाच्या माथ्यावर आहे.

१९) चाकणचा किल्ला : ऐतिहासिक महत्त्व असलेला चाकण गावातील संग्रामदुर्ग हा भुईकोट किल्ला आहे. या किल्ल्याचा कोट फक्त शिल्लक राहिलेला आहे. हा किल्ला नामशेष होण्याच्या मार्गावरआहे.

२०) हडसर किल्ला : जुन्नर तालुक्यामध्ये हडसर हा सुंदर किल्ला आहे. हडसर किल्ल्याचे दुसरे नाव म्हणजे पर्वत गड होय.



पुणे जिल्ह्यातील प्रमुख घाट :

प्रमुख मार्ग घाटाचे नाव

बोरघाट पुणे – मुंबई
कात्रज घाट पुणे – सातारा
वरंधा घाट भोर – महाड
माळशेज घाट आळेफाटा – कल्याण
खंबाटकी घाट पुणे – सातारा
दिवे घाट पुणे – बारामती
नाणेघाट जुन्नर – कल्याण
ताम्हीणी घाट मुळशी-माणगाव (रायगड)